गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

Roll Back And Down Sizing

रोल ब्याक डाऊन सायझिंग 
                     

        फार वर्षांपूर्वी साथी भाई वैद्य यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिल होत की जागातीकीकरणामुळे सार्वजनिक उपक्रमामध्ये येवू घातलेली नवी प्रणाली म्हणजेच सरकारची रोल ब्याक डाऊन सायझिंग पौलीसी. याचाच अर्थ आरोग्य, शिक्षण, वीज, परिवहन इत्यादी सार्वजनिक क्षेत्रे यांचे हळूहळू खाजगीकरण करायचे आणि त्याचबरोबर त्या त्या उपक्रमातील कर्मचार्यांची संख्या कमी करायची व त्यांचे आकारमान कमी करावयाचे. दोन्ही गोष्टी लाखो कर्मचारी व सार्वजनिक उपक्रमांवर परिणाम करणार्या असल्यामुळे रोल ब्याक डाऊन सायझिंग हे दोन्ही शब्द मेंदूमध्ये घट्ट रुतून बसले होते, पण ह्या गोष्टीनी घरात कधी प्रवेश केला ते कळलेच नाही. 
     
     गावी रहाणारया काकांचा यंदा मे महिन्यात अपघात झाला. गणेशोत्सव जवळ आला तरीही ते व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभे राहू शकत न्हवते. यंदा गणपती आणायचा कोणी इथपासून पूजा कोण करणार इथ पर्यंत सर्व प्रश्नांसहीत त्यांचे फोन वारंवार येत होते. मी सुद्धा सर्व चुलत भावाना कळविण्यास सुरुवात केली, अर्थात फेसबुक व फोन द्वारे. परिस्थितीचा अंदाज घेत ५ दिवसांचा रजेचा अर्ज करून ठेवला.

       चुलत भावांचा काहीच प्रोग्राम फिक्स होत न्हवता आणि अशातच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गावी जाण्यासाठी निघालो. निघतानाच तुमची रजा फक्त दोन दिवसांची मंजूर करण्यात आली आहे कुठल्याही परिस्थितीत तिसऱ्या दिवशी तुम्हाला हजर व्हावे लागेल हा ऑफिसचा फतवा मिळाला आणि माझ्या चिंतेत भर पडली , अर्थात विघ्नविनाशक बाप्पा यातून मार्ग काढतील या आशेवर गावी पोहचलो.
  
     गणपतीची आरास व पूजेची तयारी करून त्या दिवशी आम्ही झोपी गेलो. पहाटे पुण्याहून मोठा भावू, वहिनी व पुतण्या आले आणी घर भरू लागले. सर्वानी बाप्पाची मूर्ती घरी आणली. श्रींची पूजा चालू असताना रत्नागिरीहून आणखी एक भावू त्याच्या कुटुंबा बरोबर आला.आरती झाली आणी रत्नागिरीच्या भावाने सांगितले की तो लगेच परत जाणार आहे. सकाळपासून खुश असलेली गावातील चुलत बहीण थोडी हिरमुसली. पुण्याच्या भावालाही माझ्यासारखीच मोठ्या प्रयासाने दोन दिवसांची रजा मिळाली होती. संध्याकाळी आरती झाल्यावर सर्वानी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी निर्णय घेतला की दीड दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करायचे. दुपारपासून शांत असलेल्या बहिणीचे डोळे भरून आले.

      लहानपणी गणेशोत्सवामध्ये हेच घर भरलेले असायचे. आरत्या, मंत्रपुष्पांजली, सहस्त्रावर्तन, हास्यविनोद यांनी  ५ दिवस वेगळ्याच वातावरणाने भारलेले असायचे. त्याच घरात दीड दिवसांनी विसर्जन करण्याची वेळ यावी या विचाराने रात्रभर झोप लागली नाही.

     दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा झाल्यावर विसर्जनाची जबाबदारी मोठ्या भावावर सोपवून परत निघालो. आजूबाजूची घरेही शांत होती. चौकशी केली असता बर्याच घरी कामाधन्द्याच्या व्यापामुळे चाकरमानी आलेच न्हवते, काही आहे तिथेच रमले होते, तर काही शहरातला उत्सव सोडून गावी यायला उत्सुक न्हवते. एकूण घरोघरी त्याच चुली.
      परत येताना हिरमुसलेला बहिणीचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता अन मनात विचार आला जागतिकीकरण, स्पर्धा,मनोरंजनाची नवनवीन साधने यामुळे नात्यातील आपलेपणाचा रोल ब्याक आणी कुटुंबाचे डाऊन सायझिंग तर व्हायला लागले नाही ना ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा