सोमवार, २३ सप्टेंबर, २०१३
'विवेकी 'आक्रोश'
विवेकी 'आक्रोश'
खर तर विवेकी आक्रोश हा शब्दप्रयोग खटकला असेल ना ? डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला तरीही गुन्हेगार न सापडल्याने व्यतिथ झालेल्या तमाम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने दि २१ रोजी निघालेला 'आक्रोश' मोर्चा हा खरोखरीच विवेकी आक्रोश होता .
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ५० संस्था, अनेक जेष्ठ विचारवंत आणी मोठ्या प्रमाणात जमलेला युवावर्ग आपल्या हृदयातील खंत व्यक्त करण्यासाठी मारुती मंदिर,रत्नागिरी येथे सकाळी १० वाजल्यापासून जमायला सुरुवात झाली. देवरुखहुन अप्पा आर्ते , राजापुरहून रमाकांत मालपेकर , चिपळूण येथून सौ युगंधरा ताई राजेशिर्के , राजन इंदुलकर ,लांजा साखरपा येथील साथी आपला उद्वेग व्यक्त करण्यासाठी एकत्र होत होते.
विलास कोळपे यांनी 'कलमनामा' चे संपादक युवराज मोहिते यांनी तयार केलेल्या जादूटोणा विरोधी सचित्र कायदा ह्या पुस्तिकेची पहिली प्रत राजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमाकांत मालपेकर याना दिली आणी आजूबाजूला असलेल्या अनेक नागरिकांनी आग्रहाने विलास कोळपे यांच्या कडून पुस्तक घेणे सुरु केले( स्वागत मुल्य १ ० रुपये ). रस्त्यावरून जाणारे जेष्ठ,ऑफीसला जाण्याच्या घाईत असलेले अनेक जण वाहने थांबवून प्रतीची मागणी करत होते . अनिसचे विनोद वायंगणकर हे ही सचित्र कायद्याच्या वितरणासाठी सरसावले. १० मिनिटातच युवराज मोहिते यांनी ज्या उद्देशाने ही पुस्तिका काढली त्याचा पहिला प्रत्यय आला शेजारच्या देवळातून बाहेर पडणारे गुरव काका जवळ आले आणी म्हणाले 'ह्या कायद्या मध्ये आम्हाला (गुरव हे देवळाचे पारंपारिक पुजारी असतात ) त्रास होईल अस काहीच नाही '
'समाजभान ,रत्नागिरी ' चे अभिजित हेगशेट्ये यांनी सूत्र हाती घेतली व शिस्तबद्ध रीतीने आक्रोश मोर्चा मा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला . अनिस च्या वल्लभ वणजु ह्यांनी पहिली घोषणा दिली 'विज्ञानाची कास धरू ' आणी सर्वानी आवाज दिला 'अंधश्रद्धा दूर करू '
आक्रोश मोर्चा साठी जमलेल्या जनसमुदायाची भावना सर्वदूर पोहोचवण्यासाठी ibnलोकमत,tv 9, बेस्ट टी व्ही सह्याद्री व सर्व वृत्त पत्राचे प्रतिनिधी प्रत्येक क्षण टिपत होते. मोर्चा जसजसा कार्यालयाकडे निघाला तसे अनेक नागरिक स्वयंस्फुर्तीने मोर्चाला येवून मिळत होते. हाताच्या मुठी उंचावत प्रत्येकजण म्हणत होता ,
दबणार नाही , दबणार नाही --- विवेकाचा आवाज दाबणार नाही
हम सब --एक है
मी दाभोलकर --- तुम्ही दाभोलकर ----आम्ही सारे दाभोलकर
आक्रोश मोर्चारी मा जिल्हाधिकारी कार्यालया जवळ येताच त्याचे सभेमध्ये रुपांतर झाले. अभिजित हेगशेट्ये , संजीव अणेराव, राजन इंदुलकर, कुरतडकर साहेब, शिलभद्र जाधव , पुष्पा पाटील , उल्का पुरोहित इ अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व मा जिल्हाधिकारी याना निवेदन देवून मोर्चा संपला ---पण पुन्हा सारे एक झाले आणी पुढील कृती आराखडा ठरवण्यात आला अनेक ठिकाणाहून अनिस च्या कार्यकर्त्याना कायदा समजावून सांगा म्हणून फोन येवू लागले . खर आहे हत्येने विचार कधीच संपत नाही .
मित्रानो डॉ नरेंद्र दाभोळकर म्हणायचे परिवर्तनाचे ६ टप्पे असतात १ विचार २ उच्चार ३ प्रसार ४ संघटन ५ आचार ६ संघर्ष . निदान एक जागरूक नागरिक म्हणून आपण सारे जण विचार,उच्चार आणी प्रसार या पातळीवर तरी प्रयत्न करुया तरच या घोषणेला अर्थ आहे मी दाभोलकर --- तुम्ही दाभोलकर------- आम्ही सारे दाभोलकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा