रविवार, १७ एप्रिल, २०११

संकटमोचनम

                                                                
                रत्नागिरी रेल्वेस्टॆशन, प्लॅटफॉर्म क्र.१, दुपारी १:०० वाजता मांडवी अपने मुंबईला जाण्यासाठी थांबलो होतो, तेवढ्यात सुचना झाली की गाडी १ तास  उशिरा येणार आहे. वाट बघणे क्रमप्राप्त होत. अश्यावेळी वेळ घालवायच हमखास साधन म्हणजे चहा. प्लॅट्फॉर्मच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या टी स्टॉलवर जावून चहा घेण्यासाठी चालत स्टॉलपाशी आलो. सहज लक्ष बाकड्याकडे गेले. तेथे भगवे कपडे घातलेले एक साधूबाबा बसलेले दिसले. त्यांच्याजवळ जावून त्यांना ’बाबाजी चाय पिओगे?’ विचारले तर चलेगा एवढच म्हणून ते हसले.मी स्टॉलवर जावून दोन कप चहा घेतला व त्यांच्याजवळ आलो.चहा घेता घेता आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी म्ह्टल बाबाजी कुछ सुनाओ.ते म्हणाले बेटा तुला एक गोष्ट सांगतो ती माहीती असली तरी शांतपणॆ ऎकून घे, व ते शांतपणॆ सांगु लागले.
             ’प्रभु रामचंद्राचे दुत म्हणून हनुमानजी लंकेला लंकानरेश रावणाला समजावण्यासाठी आले. युद्ध टाळून सितामाईंना रावणाने सोडावे अशी शिष्टाई करायची होती. दरबारामध्ये हनुमान गेले तेव्हा रावण खूप उंचीवर आपल्या सिंहासनावर बसुन होता. हनुमानजींनी आपल्या शेपटीचे वेटोळे केले व रावणाच्या उंचीवर येवून रावणाला प्रभु रामचंद्राचा निरोप सांगीतला’.

              बेटा हा प्रसंग व ह्या पुढील सर्व तुला माहीती असेलच पण एवढ्यावरुन तुला काय वाटते ते सांग.   मी म्हटले बाबाजी हनुमान प्रभु रामचंद्राचे दुत म्हणून गेले होते तेव्हा त्यांचा अपमान होऊ नये म्हणून हनुमानजींनी चमत्कार करुन रावणाच्या उंचीवर जावुन त्याच्याशी वार्तालाप केला असेल. बाबाजी शांतपणे हसले.मी म्हटल बाबाजी काय झाले, तुम्हीच सांगा, तर ते सांगु लागले.
                ’बेटा त्या वेळी प्रभु रामचंद्रांच्या समोरील संकट होत ते म्हणजे लंकानरेश रावण. हनुमानजींनी विचार केला संकट आपल्यापेक्षा उंच, मोठ होता कामा नये. बेटा आपल्या आयुष्यातही असच असत, अनेक छॊटी-मोठी संकट य़ॆत असतात, पण संकटाला कधीच मोठ होऊ द्यायच नाही, नाहीतर आपण त्याखाली दबलेले राहतो. नेहमी संकटापेक्षा वर जावुन विचार कर अनेक सुटकेचे मार्ग तुला आपोआप दिसतील’.
                   बाबाजींच्या विचारांनी  अवाक होत मी त्यांना नमस्कार केला व बोगीच्या दिशेने चालु लागलो.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा