कोकणरेल्वे सूरु झाल्यापासून आम्ही रत्नांग्रीकर मुंबईला जाण्य़ाचे निमीत्त शोधत असतो. आधीच कोकणी माणूस आणि मुंबई यांच नात वेगळच आहे. नारळीपौर्णिमा दोन दिवसांवर आलेली, त्यात दोन दिवस सुट्टी अर्थात सुट्टी नसली तरी मी या दिवशी हटकून कोळीवाड्यात जातोच तसा या वर्षीही नीघालो होतो रत्नागिरी - दादर पॅसेंजरने.
एकतर तिकीट अगदीच कमी, त्यात आजुबाजुला गावची आपली माणस, बाहेर हिरवेगार कोकण आणि मध्येच सणसणत येणारी पावसाची सर जबरदस्त माहोल. खर तर प्रत्येकाने एकदातरी ह्या दिवसात या पॅसेंजरने प्रवास करावाच.एक एक स्टॆशन पुढे जात होतो.आपल्या मुंबईतल्या चाकरमान्याला सुके मासे,तांदूळ, हळद जे जमेल ते घेउन जो-तो मुंबईला निघाला होता.खेड स्टेशन गेले नी मी वाट पाहू लागलो. इथून गाडी भरते ती गावठी भाज्या विकणाऱ्या शेतकरी महिलांनी. वांगी, काकड्या, दूधी, मिरच्या सगळ्या टोपल्या भाज्यांनी भरलेल्या. मी ह्या सगळ्या भाज्या हटकून घेतो.त्या दिवशीही एकीला थांबवली. थोडी भाजी घेउन होतोय न होतेय तोवर एकदम पळापळ सुरू झाली. सर्व भाजी विकणाऱ्या महिला डोक्यावर टोपल्या घेउन धावू लागल्या.मी तीला काय झाले म्हणून विचारले तर म्हणाली" आधी पायाखाली टोपली लपवा, पास नाय ना,रेल्वेपोलीस आलेत."एवढ म्हणत ती धावत निघुन गेली. तेवढ्यात खरोखरच टी.सी. व रेल्वेपोलीस आले. इकडे-तिकडे तपासत निघून गेले. मी ती टोपली त्यांच्या नजरेला पडणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली होती.डब्यात आता यावर चर्चाही सुरू झाल्या होत्या. अर्धा तास झाला असेल, मध्येच एक स्टेशनही येवून गेले, नी ती आली. थोडीशी घाबरलेली. "टोपली हाय ना?"मी खूणेनेच बाकड्याच्या खाली खूण केली व तीची टोपली बाहेर ओढली. ’लपलो होतो’,हे पोलीसवाले मध्येच कधीतरी येतात, सगळी भाजी टाकून देतात.काय करणार परमिशन नाय ना? रेल्वे झाली, भाजी विकून चार पैसे मिळायला तरी लागले.भाऊ तुम्ही मदत केलीत म्हणून माल तरी वाचला. मी घेतलेल्या भाजीचे पैसे विचारले तर म्हणाली’ थांबा एवढी भाजी विकून येते घेयाला.गाडी पूढे जात होती, थोड्याच वेळात पेण स्टेशन येणार तेवढ्यात आली व मला म्हणाली’ भाउ हात पुढे करा! मी भांबावून बघू लागलो तर म्हणाली’ पूढच्या डब्यात पुतण्या राख्या विकतोय त्याला शोधत होते, उंद्या राखी पौर्णिमेला तुम्ही भेटाल न भेटाल तेव्हा आजच बांधते.मी हात पुढे केला, तिने राखी बांधली.एक काकडी कापून मीठ टाकून देत म्हणाली’ मी सुनंदा, कासु गावची,भाउ या कधीतरी’ आणि बाहेरचा अंदाज घेत म्हणाली, पेण आल आता उतराया पाहिजे, डोक्यावर टोपली घेत निघुन गेली. मी ही नारळीपौर्णिमेच्या उत्साहात विसरून गेलो.
अनंतचतुर्दिशीला मुंबईला यावेळी गाडी घेउन निघालो होतो. हायवेने मस्त गाणी ऎकत जात असताना अचानक बोर्ड पाहिला’ कासु’ व गाडी थांबवली.डाव्या बाजुला ओळीने कौलारू घरे, भाताच्या मळ्या पहात होतो, ही आश्चर्याने म्हणाली’ काय रे कधी गाव पाहिले नाहिस का?’ मी उजव्या हातावरच्या धाग्याकडे बघत म्हट्ल’ ह्या गावात माझी बहिण राहते’ आणि स्वत:शिच हसलो.हिला कळलच नाही मी का हसतोय ते, पण गाडी सुरु करताना ठरवल एकदा तरी गावात जायच नी भेटायच माझ्या बहिणीला अर्थात "सुनंदाला".

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा