शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

` आनंदवन भुवनी' ......2



आनंदवन भुवनी!!!
गेले अनेक दिवस वाटायच आता सुरुवात करुया पण सुरुवात होत न्हवती हे मात्र खर, पण  महाराष्ट्र टाईम्सच्या पहिल्या पानावरील ‘घेतला वसा जपण्यासाठी ’ हे आनंदवन वरील लेख वाचला आणि विचारांच्या गर्दीला वाट मिळाली.
खरतर मी चंद्रपुरला गेलो होतो नाट्यस्पर्धेसाठी. महिना जुलै, संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले असताना आम्ही संपुर्ण सेट घेउन ९०० कि.मी. नाटक करण्यासाठी आलो होतो. दि.१९ ला माझे नाटक सादर झाले. खर तर हे मी लिहिलेले दुसरे नाटक. आपली संहिता रंगमच्यावर सादर होताना प्रत्यक्ष पहाणे ही वेगळीच मजा असते. दुसरा दिवस मोकळा होता. आम्ही चौघानी आमचा प्रोग्रॅम निश्चित केला.चंद्रपुरला गेल्यावर दोन वने पाहिल्याशिवाय परत येउ नये. एक ताडोबा आणि दुसरे स्वर्गिय बाबा आमटे यांचे ‘आनंदवन’. 

      बसने आम्ही आनंदवन येथे पोहचलो. रिमझीम पाउस चालुच होता. स्वागतकक्षापासुनच आपण आनंदवन परिवाराचे सभासद होऊन जातो. आनंदवन हे एक अफाट मोठे कूटुम्ब आहे. ५००० कुष्ठ, अपंग व निराश्रीतांचे संगोपन इथे आनंदामध्ये चालु आहे.
प्रत्येक ठीकाणी वावरताना बाबांचे मंत्र सत्यात उतरलेले जाणवतात. ‘दान नादान बनविते’, ‘वेदना झाली साधना’ आणि ‘श्रम झाला श्रीराम’ ह्याचा प्रत्यय येतो. इथल्या विहीरी श्रमदानातुन तयार झाल्या आहेत. हातमागावर काम करणारी उत्तुंग आत्मविश्वासाची स्वावलंबी अपंग  शरीरे बघीतली की मागाच्या आवाजातून सुर ऎकु येउ लागतात ‘जिथे राबती हात तेथे हरी’.
         इथे काय बनविले जात नाही,अपंगाकरीता तीन चाकी सायकल, हातमागावरचे कपडे, ग्रिटींग्स, चप्पल ज्याला जे जमेल ते करण्यात प्रत्येक जण मग्न असतो. इथे निम्म्याहुन कमी हाताची बोटे असणारे हात बागेमध्ये हजारो फुल निर्माण करतात. 
                                              

आनंदवनाचा आणखी एक उपक्रम म्हणजे ‘उत्तरायण’. ह्याला वॄद्धाश्रम न म्हणता उत्तरायण म्हणायचे कारण आपण जे जीवन जगत आलो त्याच उत्तर शोधणारा हा प्रकल्प, असा पु.ल. स्वतः खुलासा करत असत. 
                                             
पावसांच्या सरींबरोबर अचानक आम्हाला स्वरलहरी ऎकु आल्या म्हणुन आम्ही तिकडे वळलो तर तिथे एक अद्ययावत ऑडीटॊरियम होते. रोजच्याप्रमाणे तिथे ‘स्वरानंदवन’ ह्या अपंगांच्या वाद्यवृंदाची प्रॅक्टीस चालली होती.गाणी, नाच सर्व काही जीव ओतुन. कोणतेही शास्त्रीय शिक्षण नसताना स्वर आणी ताल यांचा मेळ बघण्यासारखा. ह्याच नावही समर्पक ‘स्वरानंदवन’. ह्याच्या प्रयोगाला प्रत्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी पेटीवर तर वसंतराव दॆशपांडे यांनी तबल्यावर ठेका धरला होता.
                                                                 

इथे आगत्यपुर्वक राहण्याची सोय आहे पण वेळेच्या अभावी आम्ही माघारी फीरलो. मात्र ‘स्वरांनंदवन’ चे एक गीत जी बाबांचीच कविता आहे ‘पांगळ्यांच्या सोबतीला येउ द्या बलदंड बाहु, निर्मीतीच्या मुक्तगंगा या इथे मातीत वाहू’ हे ह्रुदयात कोरुनच.
( शक्य झल्यास आनंदवनच्या वेब साइटला भेट द्या)




` आनंदवन भुवनी' ....1

आनंदवन भुवनी !!!


भगवान तुम्ही वारंवार सांगितलेत,
‘अत्त दिप भव्‌’
मी अंधार म्हणत होतो तिथे प्रकाश होता.
कदाचित मला डोळॆ असतील पण नजरेचा अभाव होता.

कॄष्णा तु सांगितलेस,
‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन्‌’
आशाकिरण लुप्त झालेल्यांच्या जीवनात,
स्वकतॄत्वाचा ध्यास निर्माण करणारा विकास तिथे होता.

हे जिझस्‌ तु दयेची देवता 
तु सांगुन गेलास सेवा आणि साधना हेच जीवन.
बाबा! आनंदाच्या एका झाडाच्या सावलीच्या शोधात असणाऱ्यांना तुम्ही आनंदवन दिलेत.
तुमचेच बोल शतकानुशतके स्फुर्ती देतील.
आसवांना वेळ नाही, दूःख उधळायास आता’.